हवामान बदलापेक्षा यापासून आहे मोठा धोका…

  • Home
  • Marathi Blogs
  • हवामान बदलापेक्षा यापासून आहे मोठा धोका…

हवामान बदल हा आपल्या पृथ्वीसाठी सर्वात मोठा धोका नाही, असे कुणी सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसेल का. पण हे खरे आहे. संपूर्ण जगालाच अधिक कठोर आणि घातक धोका नक्की कशामुळे आहे हे आपण आता जाणून घेऊया…

हवामान बदलासंबंधीची आंतरराष्ट्रीय समिती आयपीसीसीच्या सहाव्या अहवालाचा पहिला भाग (AR6) हा ऑगस्ट २०२१ मध्ये प्रकाशित झाला. तो चार भागांच्या सहाव्या मूल्यांकन (AR6) अहवालाचा (AR6) एक भाग होता. त्यात सांगितले गेले की, १९७० पासून आपल्या पृथ्वीचे सरासरी तापमान गेल्या २००० वर्षांच्या इतिहासात इतर कोणत्याही ५० वर्षांच्या कालावधीपेक्षा वेगाने वाढले आहे. वैश्विक तापमानवाढीचा जगभरातील प्रत्येक प्रदेशाच्या हवामानावर आणि प्रतिकुलतेवर परिणाम होत आहे.

हे पहा जगभरात काय होते आहे

२०२२ मध्ये युरोप, सायबेरिया आणि उत्तर अमेरिकेत उष्णतेच्या लाटा आल्या… जर्मनी आणि चीन मध्ये महापूराने थैमान घातले… धूळ आणि वाळूच्या वादळाबरोबरच मध्य पूर्वेत पाण्याचे संकट आ वासून उभे राहिले… जगातील कोणताही प्रदेश यातून सुटलेला नाही. ग्रीस आणि पश्चिम उत्तर अमेरिकेत नुकत्याच अनुभवलेल्या उष्णतेच्या लाटा असोत किंवा जर्मनी आणि चीनमधील पूर असोत, हे स्पष्ट आहे की, गेल्या दशकात त्यांचे श्रेय आणि मानवी प्रभावाशी असलेले संबंध अधिक दृढ झाले आहेत. आयपीसीसीच्या अहवालानेच असा निष्कर्ष काढला आहे. जगभरात अन्न, पाणी, ऊर्जा आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींना आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे अनुभवत आहोत. सर्वात निराशाजनक बाब म्हणजे तीन दशकांपासून पर्यावरण परिषदांमध्ये विचारमंथन होत आहे, वाटाघाटीही केल्या जात आहेत. तरीही उत्सर्जन वाढतच आहे. पॅरिस हवामान करार अयशस्वी होत असल्याचे ढळढळीत वास्तव आहे.

वैश्विक तपमान वाढ रोखण्यासाठी आतापर्यंत कोणतीही पावले उचलली गेली नाहीत, असे म्हणणे चुकीचे आहे. काही सकारात्मक बाबी आहेत. त्या कोणत्या ते आपण पाहूया…

• युरोपमधील सौर ऊर्जेचा वापर लक्षणीयरित्या वाढला आहे. तेथील सौर ऊर्जेचा वापर २०२१मध्ये २८.१ गिगावॅट होता. त्यात ५० टक्क्यांनी वाढ होऊन २०२२ मध्ये तो ४१.४ गिगावॉट वर पोहोचला आहे.

ज्या देशांनी ‘नेट झिरो’ डिकार्बोनायझेशनचे वचन दिले. त्यातील ९० टक्के देश हे कार्बन न्यूट्रॅलिटीच्या मार्गावर प्रवास सुरू करण्यास तयार आहेत.

• पश्चिम भारतातील मोढेरा हे गाव संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले गाव बनले आहे. भारत हा कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित करणारा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे. भारताने दाखवून दिले आहे की, २०३० पर्यंत सौर आणि पवन यांसारख्या अक्षय स्त्रोतांकडून उर्जेची निम्मी मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या मार्गाचा अवलंब करु शकतो.

• बॅटरीच्या किंमती वाढत्या असूनही, ऑटो कंपन्या अधिक परवडणारी इलेक्ट्रिक वाहने आणत आहेत. एका चार्जिंगमध्ये कार ५०० किमीपर्यंत धावण्याची क्षमताही पोहोचली आहे.

ऐतिहासिक जैवविविधता करार

जगभरात असंख्य सकारात्मक बाबी घडत आहेत. त्यातील अलीकडची एक सकारात्मक बाब आपल्याला मी सांगू इच्छितो. २०२२ च्या शेवटच्या महिन्यात मॉन्ट्रियल (कॅनडा) येथे संयुक्त राष्ट्राच्या जैवविविधता परिषदेत करण्यात आलेला एक ऐतिहासिक करार. हाच करार निसर्गाच्या पुनर्प्राप्तीसाठी “शेवटची संधी” मानला जातो. जैवविविधतेसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या ३०% जमीन आणि पाण्याचे संरक्षण २०३० पर्यंत करण्याचे वचन या करारात अनेक देशांनी घेतले आहे. सध्या केवळ १७% जमीन आणि १०% सागरी क्षेत्र संरक्षित आहे. जगभरातील जमिनी आणि महासागरांचे संरक्षण करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आणि हेच जगाच्या हवामानाचे रक्षण करण्याच्या प्रयत्नांना चालना देते. जैवविविधता संवर्धन हे हवामान बदलाला तोंड देण्यासाठी कृती म्हणून कसे मानले जाऊ शकते, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो.

जमीन आणि सागरी परिसंस्था हे जगातील बहुसंख्य प्रजातींचे निवासस्थान आहेत. पृथ्वीवर वनस्पती आणि जीवजंतूंच्या अंदाजे ८ अब्ज प्रजाती आहेत, त्यापैकी बर्‍याच प्रजातींचा आपल्याला अजून शोध लागलेला नाही. जंगले, पीटलँड, किनारी भाग आणि महासागर हे मानवनिर्मित उत्सर्जनाच्या ५० टक्क्यांहून अधिक कार्बन शोषून घेतात. पूर्व औद्योगिक काळाच्या तुलनेत जागतिक सरासरी तापमान वाढ १.५ अंशांपेक्षा कमी ठेवण्याचे पॅरिस कराराचे केंद्रीय उद्दिष्ट आहे. ते पूर्ण करण्यासाठी जैवविविधतेची ठिकाणे महत्वाची आहेत. तसे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजमध्ये (UNFCCC) म्हटले आहे.

युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी (UNCBD) मध्ये झालेल्या कराराला ‘जैवविविधतेसाठी पॅरिस क्लायमेट मोमेंट’ असे संबोधले जाते. कारण जैवविविधता संवर्धनाचे लक्ष्य वर्ष २०३० आहे, जे २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन निम्मे करण्याचे सुद्धा लक्ष्य आहे.

थंड हवामान आणि….

माझ्यासाठी तो ‘हवामान बदलाचा निसर्ग क्षण’ देखील आहे. खरंच, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) आजच्या आधुनिक जगात मानवताही ‘नेचर इंटेलिजन्स’ (NI) म्हणजेच नैसर्गिक बुद्धिमत्ता विसरत चालली आहे. अलीकडची ३०० वर्षे सोडली तर मानव गेली तब्बल १२ हजार वर्षे कृत्रिम शीतकरण (आर्टिफिशिअल कुलिंग) आणि तपमान वाढ न करता जगला. त्याआधी निसर्गाने आम्हाला हवामान थंड ठेवण्यास मदत केली. साहजिकच, कूलिंग सोल्यूशन्ससाठी पुन्हा आपल्या शिक्षकाकडे वळणे हे आपले नैसर्गिक कर्तव्य आहे.

पॅरिस कराराच्या ग्लोबल स्टॉकटेक (GST) साठी दुबईतील पर्यावरण परिषद (COP28) अतिशय महत्त्वाची आहे. करार उद्दिष्टांच्या दिशेने जगाच्या सामूहिक प्रगतीचे मोजमाप त्याद्वारे होईल आणि २०३० च्या नवीन मार्गावर सहमती मिळेल. निश्चितपणे, नवीन मार्गामध्ये ‘निसर्ग-आधारित उपायांचा समावेश असावा, असे वाटते.

संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) ने ‘सस्टेनेबल कूलिंग’ची चळवळ तसेच ग्लोबल कूलिंग प्लेज आणि “कूल कॉप मेन्यू ऑफ अॅक्शन” विकसित करण्याची घोषणा केली आहे. इंटरनॅशनल रिन्यूएबल एनर्जी एजन्सी (IRENA)चे मुख्यालय हे दुबईतील मसदार शहरात आहे. त्याचबरोबर सर्वांसाठी शाश्वत ऊर्जा (SEforALL) हे या परिषदेत प्रमुख भागीदार असतील.

वातानुकूलन यंत्रणा (एसी)चा वापर हा जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनाच्या सात टक्क्यांपेक्षा जास्त कारणीभूत आहे. त्यामुळे २०५० पर्यंत, पृथ्वीला कार्बन न्यूट्रल बनवण्याच्या वर्षापर्यंत पृथ्वी थंड ठेवण्यासाठी (स्पेस कुलिंग) ऊर्जेची गरज आणि उत्सर्जन तिप्पट होईल.

मी याला ‘थंडीसाठी तापमानवाढीचा विरोधाभास’ म्हणतो. कूलिंगचा विस्तार केल्याने अतिसंवेदनशील समुदायांचे अति उष्णतेपासून संरक्षण होईल, अन्न ताजे राहतील आणि लस प्रभावी होतील. तसेच कर्मचारी सक्रीय आणि डिजिटल डेटा सेंटर कार्यरत होतील. त्याचवेळी, जसजसे कूलिंग वाढेल तशी तशी पृथ्वी गरम होईल. कारण, हरित गृह वायूंचे उत्सर्जन वाढेल. रेफ्रिजरेटर्स, एसी, शीतगृहे, जीवाश्म इंधनांवर आधारीत वीजेचा वापर हे सारेच त्यासाठी कारणीभूत आहे. म्हणजेच हे कुलिंग पृथ्वीला गरम बनवते आहे.

सोलर कूलिंग, सोलर कोल्ड चेन, नैसर्गिक वायुवीजन (व्हेन्टिलेशन), नैसर्गिक रेफ्रिजरेंट्स, पंखे, एअर कंडिशनर्स, रेफ्रिजरेटर्स, मोबाईल एअर कंडिशनिंग यासारखी सुपर एनर्जी एफिशियंट उपकरणे लागू करणे अत्यावश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निसर्गाचा आदर करणाऱ्या आपल्या जीवनशैलीला बदलाची नितांत गरज आहे. आपण किमान २७ अंश सेल्सिअस तापमानात जगायला शिकले पाहिजे, त्यापेक्षा कमी नाही. अन्नाची नासाडी न केल्याने कोल्ड चेनमध्ये कमी ऊर्जेची गरज भासते. हवामान बदलापासून आपल्याला कोणीही वाचवणार नाही. स्वतःला वाचवायचे आहे. त्यासाठी तर हे करायलाच हवे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *